खारघर, ता. २९ (बातमीदार) : खारघर टेकडीवर पावसाळी उत्सव साजरा करताना काही तरुण अडकल्याची घटना सोमवारी (ता. २६) घडली होती. विशेष म्हणजे, पावसाळ्यात अनेक पर्यटक धबधब्यांकडे जातात आणि त्यांना थांबवता येत नाही. त्यामुळे सरकारने खारघर डोंगर परिसर इको-टुरिझम आणि जलसंवर्धन प्रकल्प म्हणून विकसित करावा, अशी मागणी नॅटकनेक्ट फाउंडेशन आणि खारघर हिलँड वेटलँड्स फोरमने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पावसाळ्यात मुंबई, नवी मुंबई, पनवेल भागातून अनेक पर्यटक पांडवकडा धबधबा, तसेच खारघर डोंगरावरील धबधब्यांकडे जातात. काही वेळा त्या ठिकाणी अपघातही होतात. त्यामुळे सिडको आणि वन विभागाकडून प्रवेशावर बंदी घातली जाते. खारघर डोंगररांग विस्तीर्ण असल्यामुळे पर्यटक कुठूनही टेकड्यांवर जात असल्याचे खारघर हिलँड वेटलँड्स फोरमच्या ज्योती नाडकर्णी यांनी वन विभाग आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. वन विभागाने पांडवकडा धबधब्यावर एक बंधारा उभारून पर्यटकांना कपडे बदलण्यासाठी खोली बांधली आहे; मात्र ही खोली धूळखात पडली आहे. पांडवकडा विकसित करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनीही आश्वासन दिले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, बीएनएचएस, सिडको, एनएमएमसी, वन विभाग, पोलिस आणि स्थानिक पर्यावरणवाद्यांसह तातडीने समन्वय बैठक घ्यावी, असे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आले आहे.
-----------------------
नैसर्गिक संपत्तीचे वरदान
नॅटकनेक्ट फाउंडेशनचे पदाधिकारी बी. एन. कुमार म्हणाले, पांडवकडा हा सुंदर आणि जवळचा धबधबा असताना स्थानिकांना मॉन्सूनचा आनंद घेण्यासाठी लोणावळा-खंडाळा आणि माळशेज घाटावर जावे लागते. या शहराला खारफुटी, पाणथळ जागा, फ्लेमिंगो, टेकड्या, धबधबे, तसेच डोंगरांचे वरदान मिळाले असून एक उत्कृष्ट इको-टुरिझम डेस्टिनेशन निर्माण होऊ शकते.
----------------
पर्यावरणप्रेमींची डिजिटल मोहीम
खारघर आणि बेलापूरच्या डोंगरावरून पावसाचे पाणी साठवता येते. बेलापूर-खारघर डोंगरावर निसर्ग उद्यान प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करावे आणि नवी मुंबईला इको-टुरिझम डेस्टिनेशन म्हणून विकसित करावे, अशी मागणी केली असून पर्यावरणप्रेमींनी डिजिटल मोहीम सुरू केली आहे.