कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीत अवघ्या दोन महिन्यांपूर्वीपासून सुरू करण्यात आलेल्या गॅस-विद्युत दाहिनीवर पाणी गळती सुरू झाली आहे. त्यामुळे दाहिनी अक्षरशः प्लास्टिक कागद टाकून झाकून ठेवावी लागत आहे. गळतीचे पाणी वीज पॅनेलकडे जाऊ नये म्हणून भांडी ठेवण्यात आली आहेत.
पंचगंगा स्मशानभूमीत एक कोटीवर खर्च करून नवीन गॅस व विद्युत दाहिनी बसविण्यात आली आहे. त्यासाठी जुनी गॅस दाहिनी असलेली इमारत वापरली. त्याचा हळूहळू वापर होऊ लागला आहे; पण या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे तेथील वेगळीच समस्या समोर आली आहे. इमारतीच्या स्लॅबमधून, कॉलममधून मोठ्या प्रमाणावर पाणी येऊ लागले आहे.
स्लॅबवरून येणारे पाणी भिंतीवरून फरशांवर उतरत आहे. आडव्या कॉलमखालून वायरिंग करण्यात आले आहे. त्या पट्टीतून पाणी जात आहे. तिथूनही पाणी ठिकठिकाणी टपकत आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कर्मचाऱ्यांना दाहिनीचा बाहेर असलेला ट्रे झाकून ठेवावा लागत आहे. या ट्रेमधून मृतदेह दाहिनीत नेला जात असल्याने व त्यात विजेचाही वापर होत असल्याने त्यावर पाणी पडू नये, याची काळजी घ्यावी लागत आहे.
याबरोबरच दाहिनीशेजारीच विजेचे पॅनेल आहे. गळतीचे पाणी भिंतीवरून फरशीवर येत त्या पॅनेलखाली जात आहे. मोठ्या क्षमतेचा वीजपुरवठा त्यातून होत असल्याने या गळतीमुळे धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यातून कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तसेच तिथे अग्निशमनचीही काही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत असून, तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
स्लॅबसाठी उपाययोजना आवश्यक
इमारत जुनी आहे. आतापर्यंत तिचा वापर होत नसल्याने गळती दिसून येण्याचा प्रश्नच नव्हता. आता तिथे विजेचाही मोठा वापर होत आहे. त्यामुळे स्लॅबची गळती दुरुस्त करून घेण्याची नितांत आवश्यकता आहे.