फळं कापण्याचं तंत्र!
esakal May 31, 2025 08:45 AM

राजीव तांबे - साहित्यिक, बालमानसविषयक तज्ज्ञ

आपण घरी या ना त्या प्रकारे फळं आणतच असतो. केळी, काकडी, टोमॅटो, सफरचंद अशी वर्षभर मिळणारी फळं आपल्या घरात डोकावतच असतात. पण उन्हाळा म्हटल्यावर घरात हमखास येणारा फळांचा राजा आंबा आणि थंडावा देणारं कलिंगड हे हवंच. आज मी पालकांना त्याचाच थोडा गृहपाठ देणार आहे!

घरी कलिंगड, आंबा, पपई किंवा सफरचंद आणल्यावर खरं सांगा, किती पालक मुलांना फळं कापायला देतात?... ‘आणलंय फळ, कापायला पळ!’ असं किती पालक आपल्या मुलांना म्हणतात? म्हणजे घरात आणलेली फळं कापण्याची पूर्ण मुभा देतात? फारच कमी पालक अशी संधी मुलांना देतात.

मुलांना फळं का कापायला द्यावीत, हे समजून घेऊया.

आपण जेव्हा मुलाला फळ कापायला सांगतो तेव्हा ‘पालक आपल्यावर विश्वास टाकतात, आपल्याला जबाबदारीचे काम सोपवतात,’ या भावनेने मुलाला आनंद होतो. तेव्हा तो खरंच गंभीरपणे फळ कसं कापावं याचा विचार करु लागतो. असा विचार त्याने अगोदर कधीच केलेला नसतो!

फक्त पहिल्यांदाच नव्हे, तर खूप वेळा फळं कापताना चुका होणार, गडबड होणार, ऐनवेळी धांदल होणार हे गृहितच धरायचं आहे. अशा वेळी मुलांवर ओरडायचं नाही आणि त्यांना उपदेशही करायचा नाही. अशा वेळी आईने आपण लाटलेली पहिली पोळी आठवायची आणि बाबांनी पहिल्यांदा सायकलवर बसल्यावर काय झालं होतं हे आठवायचं’. बस्स! लक्षात ठेवा, चुका करण्याची संधी दिली, तरच चुकांतून शिकण्याची हिंमत मिळते. चूक होईल या भीतीपोटी एखादी गोष्टच न करणं, ही सर्वांत मोठी चूक असू शकते.

जेव्हा मुलं फळ कापत असतात तेव्हा ती अनेक गोष्टी शिकत असतात. सुरी कशी धरावी, कुठल्या कोनात धरावी, किती जोर लावावा? आणि हे शिकत असतानाच त्यांच्या लक्षात येत असतं, की आपण पुढच्या वेळी हेच फळ कापू तेव्हा काय सुधारणा करायला हव्यात?

फळ कापताना जर चूक झाली, तर ती चूक त्याला दाखवू नका. त्याऐवजी, ‘अशा प्रकारे हे फळ कापण्यामागे तुझा काय विचार होता?’ असा प्रश्न विचारा. यामुळे प्रत्येक कृतीमागे एक ठोस विचार असला पाहिजे, हे तर त्याला कळेल. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, आपल्यापेक्षा वेगळा विचार मुलगा करत आहे, हे पालकांना कळेल. आता मुख्य मुद्दा म्हणजे मुलाने फार मोठी चूक केलेली नसून, मुलाचा वेगळा विचार आणि विचारानुसार केलेली कृती यांचा समन्वय साधला न गेल्याने थोडासा गोंधळ झाला आहे. तेव्हा मुलाला नाउमेद न करता, त्याला दूषणं न देता आणि ‘आता बास झालं,’ असं म्हणत त्रागा न करता मुलाला आणखी एक संधी दिली पाहिजे. असं झालं, तर मुलाची एकंदरच शिकण्याची गती वाढू शकते.

पालक मुलांना फळं कापायला देत नाहीत याची महत्त्वाची तीन कारणं असू शकतात. एक, पालकांचा अहम्! त्यांना वाटत असतं, की सर्व काही मलाच समजतं. सर्व काही मलाच येतं. हे मीच करणार. स्वत:विषयी असणाऱ्या अशा गैरसमजुतीमुळे अशा पालकांच्या मुलांची शिकण्याची गती मंद असते.

दोन, अनेक पालक मुलांवर विश्वास टाकायला घाबरतात. त्यांना मुलांची अती काळजी असते. ते त्यांच्या मुलांना सतत झेड-प्लस सुरक्षा पुरवत असतात! ते मुलांना हातात सुरी, कात्री कधी घेऊच देत नाहीत. अशांची मुलं नेहमीच परावलंबी असू शकतात.

तीन, ‘मुलांना काही समजत नाही’ याविषयी पालक ठाम असतात. तो कुठलंही काम बिघडवणारच, त्याला काही जमणारच नाही, याबाबत त्यांची खात्री असते. अशा पालकांच्या मुलांच्या मनात स्वत:विषयी न्यूनगंड निर्माण होऊ शकतो.

विश्वासाने जबाबदारीचं काम आपल्यावर सोपवणारे पालक मुलांना आवडतात.

‘ज्या घरातले पालक मुलांनी कापलेली फळं खातात, त्यांची मुलं भविष्यात प्रगतीची फळं चाखतात,’ ही हुनान प्रांतातील चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.