नवी दिल्ली : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट-पीजी परीक्षा एकाच सत्रात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दोन सत्रात परीक्षा घेण्याचा राष्ट्रीय परीक्षा मंडळाचा (एनबीई) निर्णय मनमानी असल्याचा शेरा न्यायाधीश विक्रम नाथ, न्यायाधीश संजय कुमार आणि न्यायाधीश एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान मारला.
येत्या १५ जून रोजी ‘नीट-पीजी’ची परीक्षा होणार आहे. ‘नीट-यूजी’प्रमाणे एका शिफ्टमध्ये पूर्णपणे पारदर्शकता बाळगत ही परीक्षा घेतली जावी, असे निर्देश खंडपीठाने ‘एनबीई’ला दिले. दोन सत्रात परीक्षा घेण्यात आल्यामुळे मनमानी करण्यास वाव मिळतो. दोन सत्रातील परीक्षेमुळे असमानता निर्माण होते. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिका कधीही समान सुलभ अथवा कठीण असू शकत नाहीत. विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांच्या भवितव्यासोबत कोणत्याही प्रकारची असमानता आणि अन्याय होता कामा नये.
दुसऱ्या सत्रात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपणास कठीण पेपर येईल, अशी भीती वाटत असते, एकाच सत्रात परीक्षा घेतल्यामुळे ही भीती मिटेल, अशी टिपणी न्यायाधीश विक्रम नाथ यांनी केली. विशेष परिस्थिती असल्यामुळे गतवेळी दोन सत्रात नीट-पीजी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र यापुढे एकाच सत्रात ही परीक्षा घ्यावी, असे आदेश खंडपीठाने दिले. एका पाळीत परीक्षा घेण्याच्या अनुषंगाने देशात पुरेशी परीक्षा केंद्रे नसल्याचा युक्तिवाद एनबीईकडून करण्यात आला होता.
मात्र हा युक्तिवाद खंडपीठाने फेटाळला. तंत्रज्ञानाच्या बाबतीत देशात मोठी प्रगती झाली आहे, त्यामुळे तुमचा तर्क उचित वाटत नाही, असे खंडपीठाने सांगितले. दोन टप्प्यात परीक्षा घेण्याच्या एनबीईच्या निर्णयाला विरोध करत विद्यार्थ्यांच्या एका समूहाने याचिका दाखल केली होती.