पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले. त्यावर शर्मिष्ठा पनोली या तरुणीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. त्यावरून सध्या संपूर्ण देशात वादळ उठले आहे.
शर्मिष्ठा पनोली ही मुळची कोलकाता येथील असून ती सध्या पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत आहे. ती पदवीच्या चौथ्या वर्षात शिकत आहे.
शर्मिष्ठा सोशल मीडिया एन्फ्लुअन्सरही आहे. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. पाकिस्तानवर टीका करता तिने बॉलिवूड अभिनेत्यांबाबत केलेला व्हिडीओ चांगलाच वादग्रस्त ठरला.
व्हिडीओनंतर तिला अनेक धमक्या आल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर तिने हा व्हिडीओ डिलिट केला आणि माफीही मागितली.
मी बिनशर्त माफी मागते. त्या माझ्या वैयक्तिक भावना होत्या. कुणालाही जाणीवपूर्वक दुखवायचे नव्हते. कुणी दुखावले असेल तर मी माफी मागते, अशा शब्दांत शर्मिष्ठाने माफी मागितली होती.
शर्मिष्ठाच्या व्हिडीओवर वाद झाल्यानंतर तिच्याविरोधात कोलकाता पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर गुन्हाही दाखल झाला. शनिवारी तिला हरियाणातून अटक करण्यात आली. कोर्टाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
शर्मिष्ठाच्या अटकेचे आता जोरदार राजकीय पडसाद उमटत आहेत. भाजप, काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार आसूड ओढले आहेत.
सोशल मीडियात शर्मिष्ठाच्या सुटकेसाठी कॅंपेन सुरू झाले आहे. राजकीय नेत्यांसह अनेकांनी तिच्या सुटकेची मागणी करत आंदोलनाचा इशाराही दिला आहे.