उल्हासनगरमध्ये महिला अधिकाऱ्यांचे राज
esakal June 15, 2025 12:45 AM

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १४ : महापालिकेच्या स्थापनेपासून २९ वर्षांनंतर प्रथमच विदर्भ कन्या असणाऱ्या आयएएस महिला अधिकारी मनीषा आव्हाळे या जानेवारीमध्ये आयुक्त पदावर विराजमान झालेल्या आहेत. या सोबतच राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने यांच्या जोडीला प्रतिनियुक्तीवर चार महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने उल्हासनगर महापालिकेत पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांचे राज निर्माण झाले आहे.
उल्हासनगर महापालिकेची स्थापना १९९६ झाली. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यात महापौर म्हणून यशस्विनी नाईक, लिलाबाई आशान, ज्योती कलानी, राजश्री चौधरी, विद्या निर्मळे, मालती करोतीया, पंचम कलानी, आशा ईदनानी या महिलांनी पदभार हाताळला आहे. विशेष म्हणजे, प्रभाग समिती, विषय समितीवर महिला लोकप्रतिनिधी आणि पालिकेतही महिला अधिकारी मुख्य पदावर असल्याने महिलांच्या राजची सुरुवात झाली होती.
महापालिकेच्या स्थापनेनंतर आयुक्त पदावर प्रथमच मनीषा आव्हाळे यांची जानेवारी २०२५ मध्ये नियुक्ती झाली. महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाने आव्हाळे यांच्या जोडीला प्रतिनियुक्तीवर उपायुक्त म्हणून विशाखा मोटघरे, दीपाली चौगले, स्नेहा करपे, सहाय्यक आयुक्त मयूरी कदम यांची नियुक्ती केली आहे. तसेच महापालिकेतील स्थानिक महिला अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी-सचिव, नीलम कदम-कर निर्धारक व संकलक, अलका पवार-सहायक आयुक्त प्रभाग समिती एक, सलोनी निवकर सहायक आयुक्त प्रभाग समिती तीन, श्रद्धा बाविस्कर-सिस्टीम अनालिस्ट, विशाखा सावंत-उद्यान विभागप्रमुख आदी महिला असल्याने महापालिकेत पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्यांचे राज आलेले आहे.

आयुक्तांची कौतुकास्पद कामगिरी
आयुक्त आव्हाळे यांनी महाराष्ट्रात राबवण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या मूल्यमापनात महापालिकेच्या मुख्यालयाचा पूर्णपणे कायापालट केला. त्यामुळे मूल्यमापनात उल्हासनगरने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आव्हाळे या सर्वोत्तम आयुक्त ठरल्या आहेत. पहिल्या महिला आयुक्तांनी टीमवर्कसोबत केलेल्या या कामगिरीमुळे शहराचे नावलौकिक महाराष्ट्रात झाले आहे. याची पोचपावती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा जाहीर सन्मानही केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.