रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे, साचणारे पाणी
esakal June 15, 2025 12:45 AM

रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे, साचणारे पाणी
वाहतूक कोंडीचा त्रास; अपघाताची भीती
कांदिवली, ता. १४ (बातमीदार) ः अंधेरी ते दहिसर पूर्वेकडील द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक असते. त्यामुळे वाहनचालक मालाड येथील सर्व्हिस रोडचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सध्या या मार्गावर कचऱ्याचे ढिगारे साचल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे अपघात होण्याची भीती वाहनचालक व्यक्त करीत आहेत.
सर्व्हिस रोड कचरामुक्त करा, द्रुतगती मार्गावर बहुतांशी ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करा, अशा मागण्या वाहनचालकांमध्ये जोर धरू लागल्या आहेत. उत्तर मुंबईत प्रचंड लोकसंख्या असल्याने वाहनांची संख्यादेखील जास्त आहे. जोगेश्वरी ते दहिसर पूर्वेकडील द्रुतगती मार्गावर वाहनांची मोठी रहदारी असते.
सायंकाळी अंधेरीकडून बोरिवलीकडे येणाऱ्या वाहनांना प्रचंड वाहतुकीमुळे संथगतीने मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे वाहनचालक मालाड येथील सर्व्हिस रोडचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सर्व्हिस रोडवर कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावतो. प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. द्रुतगती मार्गावर बहुतांशी ठिकाणी उंच सखलपणा, उड्डाणपुलाच्या उतरणीला पाणी साचलेले असते. त्यामुळे दुचाकीस्वारांचा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेने येथील कचरा नियमितपणे उचलावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.