
मुंब्रा येथील एका वळणावर धावत्या लोकलमधील प्रवासी खाली पडून त्यात चार जण मृत्युमुखी तर नऊ प्रवासी जखमी झाले होते. या घटनेला जबाबदार कोण, याचा तपास रेल्वे पोलीस करत असून त्यांना रेल्वे प्रशासनाकडून सहकार्य होत नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.
मुंब्रा येथे 9 जूनला झालेला रेल्वे अपघातामुळे मोठा हाहाकार उडाला होता. ही घटना घडून आता 20 दिवस लोटले तरी या घटनेला जबाबदार कोण, ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. त्यासाठी पोलिसांना रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांची तसेच दोन्ही लोकलचे मोटरमन व गार्डचे जबाब नोंदवायचे आहेत. यासाठी तीन वेळा नोटीस बजावूनदेखील रेल्वेच्या मेंटेनन्स व इंजिनीअर विभागाचे अधिकारी जबाब नोंदविण्यासाठी हजर राहत नसल्याची माहिती पुढे आली आहे.
चौघा मोटरमन व गार्डपैकी तिघांनी हजर राहून जबाब नोंदवला आहे. जे नोटीस बजावूनदेखील चौकशीला येणार नाही. त्यांच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई होईल असेही सांगण्यात येते. रेल्वे प्रशासनाकडून सहकार्य होत नसल्याने पोलीस तपासाला म्हणावा तसा वेग मिळत नसल्याचे चित्र आहे.