उन्हाळा आला की प्रत्येकालाच ज्या फळाची सर्वात जास्त उत्सुकता असते ते म्हणजे आंबा! पण बाजारातून घेतलेले अनेक आंबे कॅल्शियम कार्बाइड किंवा इतर केमिकल्सने जबरदस्तीने पिकवलेले असतात, जे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. अशावेळी जर तुमच्याकडे कच्चे आंबे असतील, तर त्यांना घरीच नैसर्गिकरित्या आणि सुरक्षितरीत्या पिकवण्याचे काही उत्तम आणि पारंपरिक उपाय आहेत, जे या लेखात आपण पाहणार आहोत.
तांदळाच्या डब्यात कच्चे आंबे पिकवणं हा एक पारंपरिक आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामध्ये कच्चे आंबे चांगल्या प्रकारे तांदळात दाबून ठेवले जातात. तांदळाचे दाणे आंब्याभोवती एक नैसर्गिक उष्णता निर्माण करतात, त्यामुळे 2 ते 4 दिवसांमध्ये आंबे पिवळसर आणि रसाळ होतात. या पद्धतीत केमिकलचा पूर्णपणे तिटकारा असून, आंब्याची गोडी आणि गुणवत्ता कायम राहते.
जर तुमच्याकडे आंब्यांची संख्या कमी असेल, तर त्यांना एका जाड सूती कपड्यात लपेटून घराच्या कोपऱ्यात ठेवता येते. हा कपडा आंब्याची ओलावा टिकवून ठेवतो आणि गरम वातावरण तयार करतो. यामुळे हळूहळू नैसर्गिकरित्या आंबा पिकतो. हा उपाय खास करून अशा वेळी उपयुक्त ठरतो जेव्हा वेळेची फार घाई नाही
आंब्यांना वर्तमानपत्रात गुंडाळून छायेत, कोरड्या जागी ठेवणं हा एक जुना पण आजही उपयोगी उपाय आहे. कागद आंब्याभोवती थोडी उष्णता निर्माण करतो आणि त्यातून निघणाऱ्या वायूंना शोषतो. त्यामुळे आंबे हळूहळू आणि समान पद्धतीने पिकतात. दररोज वर्तमानपत्र उघडून पाहणं आवश्यक आहे, जेणेकरून आंबा पूर्णपणे पिकलाय का, हे समजेल.
पिकलेले केळं, सफरचंद किंवा इतर फळे एथिलीन नावाचा वायू सोडतात, जो आंब्याला लवकर पिकवतो. त्यामुळे कच्चे आंबे पिकलेल्या फळांसोबत बंद डब्यात किंवा पिशवीत ठेवल्यास, 1-2 दिवसांतच फरक जाणवतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे.
या सगळ्या उपायांत कुठलाही रासायनिक पदार्थ वापरलेला नसतो, त्यामुळे आंब्याची गोडी, रसाळपणा आणि पोषणमूल्यं टिकून राहतात. शिवाय, घरच्या घरी सहज करता येणारे हे उपाय पर्यावरणपूरक आणि आरोग्यास अनुकूल आहेत.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)