सुलभा तेरणीकर - saptrang@esakal.com
मुंबईच्या चित्रनगरीत आता अमृतसर-लाहोरचे बी. आर. चोप्रा आले होते, रामानंद सागर होते. कलकत्त्याचे बिमल रॉय आले होते. नवी कथा, नवे चेहरे आणि ताजे टवटवीत मधुर संगीत मुंबईच्या चित्रनगरीचे वैशिष्ट्य झालं होतं. दक्षिणेच्या एस. एस. वासनच्या जेमिनी कंपनीने यश, पैसा, लोकप्रियतेचा हुकमी एक्का असलेल्या ‘चंद्रलेखा’च्या बळावर आर्थिक गणितं फिरवून टाकली होती. लताच्या फूल कोमल स्वरात ‘अभी तो मैं जवान हूँ’ची लकेर मात्र निनादत होती... आणि भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटातील ‘आज शिवाजी राजा झाला’चे मंगल गीत...
स्वातंत्र्याचा जणू उत्सव साजरा केला दक्षिणेतील एस. एस. वासन यांच्या ‘चंद्रलेखा’ या चित्रपटाने! ‘जेमिनी’च्या मद्रासमध्ये तयार झालेल्या पहिल्याच भव्य हिंदी चित्रपटाने लोकप्रियतेचे उच्चांक मोडले. मुंबईत तयार होणाऱ्या तीन-चार चित्रपटाचे बजेट म्हणजे जवळजवळ तीस-बत्तीस लाख खर्च केले होते एका ‘चंद्रलेखा’साठी... हा एक वेषभूषाप्रधान चित्रपट होता. दोन राजकुमार आणि एक नर्तकी असा प्रेम त्रिकोण होता. अखेर त्यातल्या चांगल्या राजकुमाराशी मीलन होते अशी ‘चांदोबा’मध्ये शोभावी अशी कथा होती. तलवारबाजी, साहसी दृश्यं, आकर्षक नृत्य, भडक भव्य सेट यांनी प्रेक्षक खूष झाले. शिवाय हा मोठ्या लांबीचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा भरपूर मसाला होता. तो पुढे खूप चालला.
यातील एक खलनायक राजकुमार झाले होते एम. के. राधा आणि दुसरे राजकुमार होते रंजन! नर्तकी होत्या टी. आर. राजकुमारी! शेवटचा क्लायमॅक्स होता अद्भुत नगारा दृश्य! असे भव्य दृश्य यापूर्वी पडद्यावर दिसले नव्हते. १९४८ या वर्षातल्या ‘चंद्रलेखा’मध्ये चांगली अकरा गाणी होती, मोठा ऑर्केस्ट्रा होता; पण प्रेक्षकांना तलवारीचा खणखणाट आवडला. अशा काल्पनिक राजकुमार, प्रधान, कटकारस्थानं, तलवारबाजी असलेल्या कथानकाचे आकर्षण आजही ओसरले नाही.
रामनारायण व्यंकटरमण शर्मा म्हणजे रंजन यांच्याबद्दल थोडं सांगायला हवे. तमिळ भाषिक रंजन हे लेखन, पत्रकारिता करणारे होते आणि गायक तसेच तलवारबाजीही उत्तम करीत. हिंदीत अशा तऱ्हेच्या चित्रपटातून ते दिसले. ६१ या वर्षातल्या ‘सखी रॉबिन’ या चित्रपटात ऐटबाज रंजन घोडेस्वारी करताना ‘तुम जो आओ तो प्यार आ जाये’ हे नितांत सुंदर युगूल गीत गाताना दिसतात. काहीही असो असे निखळ मनोरंजनाचे दालन ‘चंद्रलेखा’ने खुले केले. एका वर्षातच ‘जेमिनी’ने दोन कोटींचा गल्ला जमवला. कलात्मक, सुंदर, भव्य चित्रपट निर्मितीच्या या उत्सवात ५० सालच्या ‘हर हर महादेव’ने पण प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि पुराण कथा, चमत्कार, नृत्य, संगीत यांनी प्रेक्षकांना आकर्षित केलं.
गुजरातमधल्या दाहोद या खेड्यातली कोकिळाबेन भगवानदास चौहान ही चौदा-पंधरा वर्षे वयाची गोरी, रूपसुंदर मुलगी लग्न होऊन मुंबईत ४६ मध्ये आली. पतीच्या प्रोत्साहनामुळे सिनेमात आली आणि निरूपा रॉय झाली. निरूपाजी आठवणी सांगत, की ‘‘मी पार्वती, लक्ष्मी व्हायची आणि दागिन्याच्या ओझ्याखाली दबून जायची. ‘नागचंपा’, ‘नागपद्मिनी’सारख्या चित्रपटात माझे हीरो असायचे नाग, साप... कधी रात्री दचकून जागी होत असे. वाटायचं साप वळवळत आहेत...’’ पौराणिक सिनेमातून निरूपा रॉयने बाजी मारली; पण पुढे सामाजिक चित्रपटातूनदेखील! अगदी थेट बिमल रॉय यांच्या ‘दो बिघा जमीन’ या ऐतिहासिक महत्त्वाच्या चित्रपटात स्थान मिळवलं... ‘बॉम्बे टॉकीज’ अखेरच्या पर्वात ‘संग्राम’ हा अशोककुमार, नलिनी जयवंत या लोकप्रिय जोडीने गाजत होता; पण त्याहीपेक्षा संगीतकार सी. रामचंद्र गाजत होते. ‘उल्फत के जादू का दिल में असर है...’ १९५० या वर्षातल्या ‘संग्राम’चे दिग्दर्शक होते ज्ञान मुखर्जी आणि त्यांचे सहाय्यक होते गुरूदत्त... लवकर स्वतंत्र उदयाची वेळ येऊन ठेपली होती. ‘फिल्मीस्तान’चे ‘समाधी’ आणि सरगम’ पण गाजत होते. किशोर साहू कामिनी कौशल या जोडीचा ‘नमुना’ हा चित्रपट विस्मृतीत गेला; पण पहिल्यांदा सी. रामचंद्र लता या माधुर्य पर्वाचा प्रारंभ ‘नमुना’मधून झाला आणि पुढे सिनेसंगीतप्रेमींसाठी त्यांनी अक्षरशः शेकडो गाण्याची रास रचली.
समाधी’मधल्या गोरे गोरे ओ बाँके छोरे’ या लता-अमीरबाई कर्नाटकी यांच्या गाण्याने सिनेसंगीताचा मूड पालटला. यात प्रथमच पियानो ॲकॉर्डियन या वाद्याचा प्रयोग केला गेला आणि नंतरच्या कळात या वाद्याने राज्य केलं. ‘ताज’मधील अन्य हॉटेलातील बँड सी. रामचंद्र ऐकत. ब्रिटिश काळातले ते संगीत वैभव होते. त्याचा सूचक वापर सी. रामचंद्र यांनी प्रथम केला असं म्हटले जाते. गोव्याचे वादक, वाद्यवृंद्य संचालक यांचा प्रवेश सिनेसंगीतात झाला; पण सी. रामचंद्रांनी त्यांच्या आवडत्या ‘बागेश्री’चाही मुक्त प्रयोग केला आणि रसिकांना तृप्त केलं.
‘सरगम’ ही एक फँटसी फिल्म होती, राजकपूर रेहाना जोडीची’ त्यातलं लता- सरस्वतीबाई राणे यांचे युगूल गीत कोण विसरेल? शास्त्रीय संगीताची किराणा घराण्याची ध्वजा पुढे नेणाऱ्या सरस्वतीबाईंनी ‘जब दिल को सतावे गम, तू छेड सखी सरगम’ गाऊन एक सुंदर सिनेगीत दिलं आहे. ५० मध्येच शाहीद लतीफ यांचा ‘आरजू’ हा चित्रपट आला. ‘इनॉक ऑर्डेन’ची म्हणजे राजकपूरच्या ‘संगम’सारखी कथा होती. नायक होते दिलीपकुमार आणि नायिका कामिनी कौशल. संगीतकार होते अनिल विश्वास. या चित्रपटात गायक तलत मेहमूद यांचे मुंबईच्या चित्रपट संगीतात आगमन हे एक लक्षणीय पाऊल ठरले. लखनौची अदब, उर्दूची नजाकत, मृदू, मखमली, मोरपंखी ही विशेषणं एकवटलेला स्वर त्यात हलकासा कंप, देखणं रूप असे तलत कलकत्त्यात ‘राजलक्ष्मी’ या चित्रपटाद्वारे १९४५ मध्ये आपले नाव गायक म्हणून नोंदवून आले होते. तपनकुमार या नावाने काही गैरफिल्मी गीत गायले होते. अनिल विश्वाससारख्या मातब्बर संगीतकारापुढे तलत आपल्या स्वरातला हलकासा कंप हा दोष समजून गायले. अनिल विश्वास म्हणाले, ‘‘हा कंप तर तुझ्या स्वराचे सौंदर्य!’’ हा नसेल तर गल्लोगल्ली तलत मेहमूद दिसतील. हे सौंदर्यस्थान ओळखून तलत गायले. ‘ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल जहाँ कोई ना हो...’ गालिबच्या गझलच्या आधारे मजरूह यांनी लिहिलेले गीत अजरामर ठरले; मात्र गायक आणि नायक होऊ इच्छिणाऱ्या तलत मेहमूद यांची कारकीर्द काही काळ दोलायमान झाली; पण पुढे हा अलौकिक स्वराचा गायक आपल्याला लाभलाच!
दिल्ली येथला जन्म. भोपाळ येथे शिक्षण आणि गोड आवाजामुळे दिल्ली, मुंबई, लाहोर, भोपाळ अशा ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम करणारी एक तेरा वर्षांची मुलगी संगीतकार अनिल विश्वास यांनी हेरली. ‘आरजू’मध्ये तिनंही एक गाणं गाऊन आपल्या पदार्पणाची ग्वाही दिली. ‘तुम मुझे भूल भी जाओ, तो ये हक है तुमको’ या ‘दीदी’ चित्रपटातील गाण्याची चाल त्यांचीच! शिवाय अरुण दाते- सुधा मल्होत्रा यांचे ‘शुक्र तारा मंद वारा’ हे गीत आणि ‘विसरशील खास मला’ हे भावगीत मराठी रसिकांच्या परिचयाचे! पण सुधा मल्होत्रा म्हणत ‘मराठी रसिक मला विसरले...’
नवनव्या गायकांनी, कवींनी, संगीतकारांनी मुंबईची चित्रसृष्टी नित्य नवे विभ्रम करणाऱ्या नवतरुणीसारखी सजत होती. त्यात एका सिनेमानं पछाडलेला युवकाचं आगमन मुंबईत झालं बलदेवराज चोप्रा. पुढे बी. आर. चोप्रा म्हणून त्यांनी स्वतःचे साम्राज्य निर्माण केलं. बी. आर. चोप्रा मात्र स्वतंत्र भारतात निर्वासित म्हणून आले नाहीत; तर मेहबूब खान आणि सोहराब मोदी यांनी त्यांच्यासाठी गाडी पाठवली होती. अमृतसर येथे राहणारे आणि सिनेमाने गजबजलेल्या लाहोरला नित्य चकरा मारणारे बी. आर. चोप्रा पदवीधर होते, सिनेपत्रकारिता करीत होते. सिनेमाचा ध्यास घेतलेले होते. लाहोरला भेटलेल्या मेहबूब खानना फर्ड इंग्रजी बोलून मी चांगलं प्रभावित केलं होतं असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं; पण खरं म्हणजे लाहोर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये शिकलेला हा युवक कलकत्त्याच्या ‘व्हरायटीज’या सिनेसाप्ताहिकात लिहीत होता. ‘पुराण कथा, स्टंटमध्ये रमलेल्या सिनेमात ज्वलंत सामाजिक विषय आले पाहिजेत, असं निर्भीड लिहीत होता. मेहबूब खान त्यामुळे प्रभावित झाले होते. शिवाय बी.आर.ना अवघा पंजाब माहीत होता. भारतीय जीवनशैली ठाऊक होती.
मुंबईत ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये नोकरी करताना त्यांना इंद्रसेन जोहर हे लेखक भेटले. एका कॅमेरामनला हाती धरून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात त्यांनी धाडसानं पाऊल टाकलं. चित्रपट होता ‘अफसाना’. वर्ष होतं १९५१ अशोककुमार आणि नायिका वीणा यांच्या भूमिकांनी सजलेल्या चित्रपटानं रौप्य महोत्सव साजरा केला. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने तत्कालीन संपादक दुर्गादास म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी माझ्याकडे नोकरी मागायला आलेल्या युवकानं केवढी झेप घेतली!’’ पत्रकारांनी मुक्तकंठानं प्रशंसा केली. पुढे अर्थातच सामाजिक, ज्वलंत समस्यांवरील चित्रपट आणि बी. आर. चोप्रा हे समीकरण झालं. या चित्रपटात एक गीत ऐकू येतं... ‘अभी तो मैं जवान हूँ...’ तेही अविस्मरणीय गीत ठरलं. रेडिओ सिलोनच्या ‘हमेशा जवाँ गीत’चे चिरतरुण लता गीतं ठरलं...
इथे कोल्हापुरात भग्न, उद्ध्वस्त स्टुडिओ भालजी पेंढारकरांनी एकेक काडी जमवून उभा केला. वास्तू भग्न होती. हृदय विदीर्ण होते; पण जिद्द अफाट होती. देव, देश आणि धर्म या सूत्रांचा पीळ घट्ट होता. पुढील चित्रपटाची तयारी सुरू केली. चंद्रकांत शिवराय साकारणार. गजानन जागिरदार औरंगजेब, शहाजी राजे बाबूराव पेंढारकर, जिजाबाई लीलाबाई पेंढारकर, संगीतकार सी. रामचंद्र!
प्रभाकर पेंढारकर लिहितात, ‘एका सकाळी बाबा चंद्रकांतांना घेऊन पन्हाळगडावर गेले. महालक्ष्मीच्या देवळात घेऊन गेले. तिथला तिलक भाळी लावला; म्हणाले, ‘‘राजे इथं येत आणि बाबांनी चंद्रकांतांना झुकून मुजरा केला. आजपासून तुम्ही चंद्रकांत नाहीत. तुम्ही कुणाला मुजरा करायचा नाहीत. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आहात! आयुष्यात अशी भूमिका करण्याचा योग क्वचित येतो...’’
चित्रीकरण झालं. खुद्द लता मंगेशकर पंचारती घेऊन मराठमोळ्या वेषात उभ्या राहिल्या आणि गाऊ लागल्या, ‘आज शिवाजी राजा झाला...’ भग्न वास्तूत शिवकाल सजीव झाला... तिथून तो गेला नाहीच जणू...
(लेखिका ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आहेत.)