राहुल गांधींचे 5 खळबळजनक दावे, महाराष्ट्रात मोठा घोळ? निवडणूक आयोग आरोपीच्या पिंजऱ्यात!
GH News August 07, 2025 06:09 PM

काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील मतदान प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे, असा आरोप त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. विशेष म्हणजे राहुल गांधींनी केलेल्या सर्व आरोपांचे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. दरम्यान, आता मात्र राहुल गांधी यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कथित घोटाळ्याचे सर्व पुरावेच बाहेर काढले आहेत. थेट आकडेवारी, फोटो आणि यादी सादर केल्यामुळे आता महाराष्ट्रासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

पहिला आरोप

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी देशातील निवडणुकांत घोटाळा होत असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाच महिन्यांत पाच वर्षांपेक्षा जास्त मतदार वाढले, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय.

दुसरा आरोप

तसेच, महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय झाला. पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र इंडिया आघाडी पराभूत कशी काय झाली? महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान तब्बल एक कोटी मतदार वाढले, असा दुसरा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.

तिसरा आरोप

याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो. पण आमच्या या आरोपांवर त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा दिसरा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच निवडणूक आयोगाने आम्हाला डिजिटल डेटा का दिला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चौथा आरोप

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतर मतदान वाढलं. भाजपा आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरली आहेत. चार पोलिंग बुथवर एकाच व्यक्तीने मतदान केल्याचे समोर आले. एकाच व्यक्तीचे कर्नाटक, महाराष्ट्र आणि यूपीमध्ये मतदान आहे, असाही आरोप राहुल गांधींनी केला.

पाचवा आरोप

अनेक मतदारांचे मतदार यातीत फोटोच नाहीत. किंवा मग ते फोटो एवढे छोटे आहेत, जे ओळखायला येतच नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. नव्या मतदारांसाठी फॉर्म 6 चा वापर केला जातो, असा पाचवा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

निवडणूक आयोग, भाजपा काय उत्तर देणार?

दरम्यान, आता राहुल गांधी यांनी मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचे सांगताना थेट पुरावे सादर केल्यानंतर आता निवडणूक आयोग यावर कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच भाजपादेखील यावर कोणती प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.