विशाल शिंदे
परभणी : श्रावणी सोमवार असल्याने भाविक दर्शनासाठी जात आहेत. त्यानुसार दर्शनासाठी कावड यात्रा घेऊन जात असलेल्या भाविकांमध्ये कावड यात्रेसोबत असलेली कार अनियंत्रित होऊन घुसली. यामध्ये भाविक चिरडले गेले असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार भाविक जखमी झाले असून जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
परभणीच्या पाथरी तालुक्यातील खेडुळा पाटी येथे पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या अपघातात ऋषिकेश सुरेशराव शिंदे (वय १६) व एकनाथ गंगाधरराव गजमल (वय ५०) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीची नावे आहेत. दरम्यान श्रावण महिना असल्याने भाविक कावड यात्रा काढत जवळच्या महादेवाच्या मंदिरावर दर्शनासाठी जात आहेत. त्यानुसार पाथरी येथून काही भाविकांची कावड यात्रा सेलूच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. वाटेतच भाविकांवर काळाने झडप घातली.
Ambarnath Palika : एक महिन्यात समस्या सोडवा, अन्यथा पालिकेला टाळं ठोकू; पालिकेवर धडक देत भाजपचा इशारावाहनाला धडकून कार अनियंत्रित
परभणीच्या सेलू तालुक्यातील भाविकांची कावड रविवार (१० ऑगस्ट) पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी येथे पोहोचली होती. आज ११ ऑगष्ट रोजी गोदावरी नदीचे पवित्र पाणी घेऊन पहाटे भाविक भक्तिगीतांच्या तालावर व जल्लोषात पायी सेलूकडे परत निघाले होते. मात्र पहाटे साडेपाचच्या सुमारास पाथरी शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर खेडुळा पाटीजवळ कावड सोबत असलेली कार अज्ञात वाहनाला धडकली. यानंतर नियंत्रण सुटून थेट भाविकांवर आदळली.
कारमधील चौघेजण फरार
तीन ते चार भाविक जखमी झाले असून त्यांना तातडीने सेलू येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर अपघातग्रस्त कारमध्ये प्रवास करणारे तिघे-चौघे घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहांचे शवविच्छेदन पाथरी ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपककुमार वाघमारे आणि पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी घटनास्थळ व रुग्णालयाला भेट देऊन तपासाची पाहणी केली.