Solapur: कलाकेंद्रात बारी लावण्यावरून वाद, तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हा महाराष्ट्र हादरला!
Tv9 Marathi September 11, 2025 06:45 AM

सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काल जिल्ह्यातील वैराग मध्ये बीडच्या गेवराई तालुक्यातील एका माजी उपसरपंचाने नर्तिकेच्या प्रेमाच्या नादात आत्महत्या केल्याचा एक धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर आता माढ्याच्या वेणेगाव येथे जय मल्हार कलाकेद्रांच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेत पायाला गोळी लागल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने सोलापूरसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बारी लावण्यावरून तरुणांमध्ये वाद

समोर आलेल्या माहितीनुसार, एकच बारी लावण्यावरून तरुणांमध्ये वाद झाला, या वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यामुळे एका व्यक्तीने गोळीबार केला. यात देवा बाळु कोठावळे हा तरुण जखमी झाला आहे. देवा हा पंढरपूर जवळील वाखरी गावचा रहिवाशी आहे. या घटनेनंतर टेभुर्णी पोलिसांनी पिस्टल ताब्यात घेऊन सुरज पवारसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

वादानंतर गोळीबार

कलाकेंद्रात एकच बैठक लावण्यावरून वाद झाला आणि त्यातून गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीने पिस्टलने देवा याच्या डाव्या बाजूच्या मांडीवर फायर केल्याने तो जखमी झाला आहे. नेमका गोळीबार कोणी केला, त्या आरोपीचे नाव मात्र टेभुर्णी पोलिसांनी अद्याप उघड केलेले नाही. सध्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. आधी वैराग आणी त्यानंतर आता माढ्याच्या वेणेगाव मधिल या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

गोविंद बर्गे यांनी संपवलं आयुष्य

बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी धक्कादायक पाऊल उचलत थेट आयुष्य संपवले. आपल्या चारचाकी गाडीमध्येच त्यांनी गोळी झाडून आयुष्याचा शेवट केला. पोलिसांनी या प्रकरणी कला केंद्रात डान्स करणारी नर्तकी पूजा गायकवाड हिला ताब्यात घेतले असून तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नातेवाईकांच्या दाव्याने नवा ट्विस्ट

गोविंद बर्गे यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसलेला असताना आता नातेवाईकांनी थेट मोठा खुलासा केला. नातेवाईकांनी म्हटले की, गोविंदने त्याच्या अख्ख्या आयुष्यात कधी त्याच्याजवळ साधी काठीही ठेवली नाही मग त्याच्याकडे बंदूक कुठून आली. मुळात म्हणजे आमच्या गोविंदकडे कधी बंदूक नव्हतीच. बरोबर काल रात्रीच त्याच्याजवळ ही बंदूक कशी? गोविंदने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आलीये, असा दावा नातेवाईकांकडून केला जातोय. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.