पुण्यातील नाना पेठेतील आयुष कोमकर खून प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना अटक केली असून, मुख्य आरोपी सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर याला समृद्धी महामार्गावर खासगी बसने प्रवास करत असताना पकडले. मंगळवारी (दि. ९ सप्टेंबर) सर्व आरोपींना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा बंडू आंदेकरने धक्कादायक दावा करत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले.
बंडू आंदेकरचा कोर्टातील दावा: "मी नातवाचा खून का करू?"आंदेकरने कोर्टात सांगितले की, त्याच्यावर खोटे आरोप लावण्यात आले आहेत. "माझ्या मुलाचा खून गेल्या वर्षी झाला होता, त्यात मी फिर्यादी आहे. माझी मुलगी कल्याणी आणि तिच्या कुटुंबाने त्या खुनात कट रचला होता. त्यामुळे त्यांनी माझ्यावर सूडबुद्धीने हे आरोप लावले आहेत," असे त्याने सांगितले.
तसेच, "आयुष माझा नातू आहे, मी त्याचा खून का करू? मला कोणता फायदा होणार? वनराजचे अनेक चाहते होते, त्यापैकी कुणीही हे कृत्य केले असावे," असा दावा त्याने केला. आंदेकरने पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले की, त्याच्याकडून काहीही जप्त झाले नाही आणि त्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. तसेच, त्याच्या कुटुंबीयांना, विशेषत: वृंदावनी वाडेकर यांना सूर्यास्तानंतर महिला पोलिस अधिकाऱ्यांशिवाय अटक केल्याचा आरोपही त्याने केला.
Andekar Gang: कशी सुरू झाली आंदेकर टोळीची दहशत? भांड्याचा व्यवसाय ते अंडरवर्ल्ड कनेक्शन! ४ पिढ्यांचा पडद्यामागचा काळा इतिहास केरळ पर्यटनातून पकडला गेला बंडू आंदेकरपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडू आंदेकर याने २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत एका नामांकित ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत केरळ टूर बूक केली होती. यावेळी त्याच्यासोबत तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, त्यांच्या पत्नी आणि वृंदावनी वाडेकर होते. त्यांनी दक्षिण भारतातील पद्मनाभस्वामी मंदिरासह अनेक मंदिरांना भेटी दिल्या. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास ते विमानाने मुंबईत परतले. त्यानंतर खासगी बसने नाशिक, वणी आणि मेहकरमार्गे प्रवास करत असताना पोलिसांनी त्यांना समृद्धी महामार्गावर पकडले.
पोलिसांनी कसा लावला ट्रॅप?आयुष कोमकर खून प्रकरणाचा गुन्हा दाखल झाल्याने बंडूला पोलिसांचा ससेमिरा लागल्याची चाहूल लागली होती. मात्र, पोलिसांच्या खबऱ्याने त्याचे ठिकाण शोधून काढले. गुन्हे शाखेच्या पथकाने प्रथम बंडूला बस बूक करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बंडू प्रवास करत असलेली बस शोधली. सहायक पोलिस निरीक्षक किरण नाईक, पोलिस उपनिरीक्षक गौरव देव, हवालदार सुरेंद्र जगदाळे, कर्मचारी अनिल कुसाळकर, पवन भोसले आणि गीतांजली जांभुळकर यांच्या पथकाने नाशिक येथे बसचे लोकेशन तपासले. बस पोलिसांपासून १५० किलोमीटर दूर असताना दोन मोटारींनी पाठलाग करून मेहकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बस थांबवली. पोलिसांनी बस तपासताच बंडूसह इतर तिघांना ताब्यात घेतले आणि पुण्यात आणले.
पोलिसांची यशस्वी कारवाईही कारवाई अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे आणि कुमार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलिसांनी अत्यंत चपळाईने आणि गुप्त माहितीच्या आधारे ही मोहीम यशस्वी केली. बंडू आंदेकर आणि त्याच्या साथीदारांना अटक झाल्याने या खुनाच्या कटाचा पर्दाफाश होण्यास मदत झाली आहे.
खुनामागील कारणेआयुष कोमकर खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी आंदेकर कुटुंबातील घरगुती वाद आणि मागील खुनाच्या प्रकरणातील सूडबुद्धी यामुळे हा गुन्हा घडल्याचा संशय आहे. पोलिस आता सर्व आरोपींची कसून चौकशी करत असून, खुनाच्या कटातील इतर संशयितांचा शोध घेत आहेत.
पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणाने पोलिसांच्या तपास यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. बंडू आंदेकर आणि त्याच्या साथीदारांना अटक करून पोलिसांनी या प्रकरणातील महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आता न्यायालयात या प्रकरणाचा खुलासा कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Bandu Andekar: आयुष माझा वैरी आहे का? मला मारायचं असतं तर… कोर्टात बंडू आंदेकराचा मोठा दावा; युक्तिवादाची A टू Z माहिती