भारत करणार जगाचं तोंड गोड, निर्यातीसाठी साखरेचा मोठा साठा, लवकरच सुरु होणार उसाचा गळीत हंगाम
Marathi September 12, 2025 10:26 PM

इंडिया साखर निर्यात: देशातील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र आहे. त्यामुळं दरवर्षी भारतात मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन होतं. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश म्हणून जगभरात भारताची ओळख आहे. दरम्यान, यावर्षी 1 ऑक्टोबरपासून उसाचा गळीत हंगाम सुरु होणार आहे. या नवीन पीक हंगामात निर्यातीला परवानगी देण्यासाठी पुरेसा अतिरिक्त साखरेचा साठा ठेवण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. भारतातील साखर निर्यातीमुळे जागतिक किमतींवर दबाव येऊ शकतो, परंतु यामुळे भारत सरकारला देशांतर्गत साखरेच्या किमतींना आधार मिळण्यास आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी किमान आधारभूत किंमत मिळण्यास मदत होईल.

10 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती

नवीन हंगामात साखर निर्यात होण्याची शक्यता आहे. उत्पादनात घट असूनही भारताने चालू विपणन वर्षात (सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या) 10 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती.

उसापासून इथेनॉलचे विक्रमी उत्पादन

पुढील हंगामाचे उत्पादन चांगले दिसते आणि देशांतर्गत वापर आणि इथेनॉल उत्पादनाच्या गरजा पूर्ण केल्यानंतरही निर्यातीसाठी पुरेसा साठा उपलब्ध असणार आहे. नवीन हंगामात उसापासून सुमारे 4.8 अब्ज लिटर इथेनॉलचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे, जो आतापर्यंतचा विक्रम असणार आहे.

भारताचा साखरेचा साठा वाढणार

भारतीय साखर आणि जैव-ऊर्जा उत्पादक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 2025-26 या मार्केटिंग वर्षात (1 ऑक्टोबरपासून) उत्पादन 34.9 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढू शकते. नवीन हंगामात देशातील साखरेचा वापर 28.5 ते 29 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, जो या वर्षी 28 दशलक्ष मेट्रिक टन होता. भारत नवीन विपणन वर्षाची सुरुवात 5 दशलक्ष मेट्रिक टनांच्या सुरुवातीच्या साठ्याने करेल, जो या वर्षाच्या सुरुवातीला 8 दशलक्ष मेट्रिक टन होता.

भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन

भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन घेतलं जातं. आपली देशाची गरज भागवून देश मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यात परदेशात करतो. दरम्यान, मागली वर्षी काही राज्यांमध्ये ऊसाचं क्षेत्र घटलं होतं. त्यामुळं ऊसाचा गळीत हंगाम देखील कमी दिवसाचा झाला होता. परिणामी उत्पादन देखील काही प्रमाणात कमी झालं होतं. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात उसाच्या लागवडी झाल्या आहेत. त्यामुळं यावर्षी साखेरच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

सोलापुरातील कारखानदारांनी शेतकऱ्यांचे 82 कोटी रुपये थकवले, फौजदारी कारवाई करण्याची मागणी, कोणाकडे किती थकबाकी?

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.