92137
एकवीस दिवसांच्या गणरायांना
सावंतवाडीत भक्तिपूर्ण निरोप
सावंतवाडी, ता. १७ ः शहरातील २१ दिवस विराजमान झालेल्या सार्वजनिक गणरायांना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. पावसाचा व्यत्यय असूनही गणेशभक्तांचा उत्साह कायम होता. ढोल-ताशांचा गजर, बेंजोचा नाद आणि आकर्षक देखाव्यांनी विसर्जन मिरवणूक लक्षवेधी बनली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणांनी मोती तलाव परिसर दुमदुमून गेला.
शहरातील तळकोकणातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा, उभाबाजार हनुमान मंदिर गणेशोत्सव मंडळ, आणि वैश्यवाडा हनुमान मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. पावसाच्या सरी कोसळत असतानाही भाविकांनी छत्री आणि रेनकोट परिधान करून मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला. रात्री उशिरा पावसाने विश्रांती घेतल्यानंतर या उत्साहात अधिकच वाढ झाली. विसर्जन मिरवणुकीत ढोल पथक, हलगी पथक आणि बेंजोच्या सुमधुर तालावर तरुणाई थिरकत होती. वारकरी भजन आणि महिलांच्या फुगडीने मिरवणुकीत आणखी रंगत आणली. उभाबाजार येथील मारुती, वैश्यवाडा येथील भवानी आणि सालईवाडा येथील नरसिंह अवताराचे देखावे विशेष आकर्षण ठरले. महिला, तरुण आणि गणेशभक्त देहभान विसरून नाचत होते. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मिरवणुकीनंतर मोती तलावात मूर्तींचे थाटामाटात विसर्जन करण्यात आले. या सोहळ्यासाठी मोती तलाव परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.