टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाली आहे. मात्र अजूनही जसप्रीत बुमराह काही तिथे गेला नाही. जसप्रीत बुमराह लवकरच ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आल्याने तो इतर खेळाडूंसोबत प्रवास करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी काही दिवस आराम करणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धचा कसोटी सामना संपल्यानंतर जसप्रीत बुमराह मुंबईत परतला. पण शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा जसप्रीत यावेळी वेगळ्याच मूडमध्ये दिसला. मुंबई विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या कॅमेरामनवर चिडला. तसेच त्यांना तेथून जाण्यासही सांगितले. जसप्रीत बुमराहचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जसप्रीत बुमराह विमानतळाबाहेर येतात त्याला कॅमेरामनने गराडा घातला. तसेच त्याच्या त्याच्या मार्गात अडथळे आणले. त्यामुळे तो फोटोग्राफर्सवर वैतागलेला दिसला. बुमराहने एक दोन वाक्यातच फोटोग्राफर्सचे कान टोचले. इतकंच काय तर जसप्रीत बुमराह म्हणाला की, मी कॅमेरामनला बोलवलंच नव्हतं.
जसप्रीत बुमराह रागाच्या भरात म्हणाला की, ‘मी तुम्हाला बोलवलंच नव्हते. तु्म्ही दुसऱ्या कोणासाठी आला आहेत. तो येणार असेल.’ बुमराहच्या बोलण्यातून स्पष्ट होते की, संबंधित फोटोग्राफर हे दुसऱ्या कोणा सेलिब्रेटीची वाट पाहात होते. म्हणून त्याने त्यांना फटकारले. त्यानंतर एक कॅमेरामन म्हणाला की, ‘भावा, तू दिवाळीचा आमच्यासाठी बोनस आहे.’ कॅमेरामनच्या अशा बोलण्याने बुमराह अजून चिडला. त्याने उत्तर देत सांगितलं की, ‘अरे भाऊ, मला माझ्या गाडीकडे जाऊ दे.’ या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. अनेकांनी जसप्रीत बुमराहला त्रास देणाऱ्यांना फटकारलं आहे.
View this post on Instagram
A post shared by Gaikwad Ganesh (@videoagrapher_ganesh)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 ऑक्टोबरपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका संपली की 29 ऑक्टोबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेपूर्वी जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. दरम्यान, जसप्रीत बुमराहची वेस्ट इंडिजविरुद्धची कामगिरी सरासरी राहिली. त्याने दोन सामन्यात एकूण 51.5 षटके टाकली आणि सात विकेट घेतल्या.