पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मागच्या काही दिवसांपासून सशस्त्र संघर्ष सुरु आहे. मागच्या आठवड्यात पाकिस्तानने काबूलमधील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर हा संघर्ष सुरु झालेला. 8 ऑक्टोंबरपासून सुरु असलेल्या या लढाईत बुधवारी संध्याकाळी सीजफायरवर एकमत झालं होतं. पण शुक्रवारी रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पाठीत खंजीर खुपसला. सीजफायरच उल्लंघन केलं. अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले. पाकिस्तानी सैन्याने पक्तिका प्रांतात एअर स्ट्राइक केली. निवासी घरांना लक्ष्य केलं. यात काही युवा क्रिकेटपटुंचा मृत्यू झाला.
पक्तिका प्रांतात पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान क्रिकेटच मोठं नुकसान केलं आहे. या हल्ल्यात तीन स्थानिक क्लब क्रिकेटरचा मृत्यू झाला. चार खेळाडू जखमी झाले. कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून अशी मरण पावलेल्या क्रिकटर्सची नावं आहेत. त्याशिवाय अन्य पाच लोकांचा मृत्यू झाला. हे खेळाडू प्रांतीय राजधानी शराना येथे एक स्थानिक क्रिकेट टुर्नामेंट खेळून परतीच्या वाटेवर असताना ही घटना घडली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या बद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूंनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने काय निर्णय घेतला?
पक्तिकाच्या हवाई हल्ल्यात देशांतर्गत खेळाडूंचा मृत्यू झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत तिरंगी मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्राय सीरीज 20 नोव्हेंबरपासून सुरु होणार होती.
‘हा घोर अपमान’
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज फजलहक फारूकीने एक्सवर पोस्ट करुन या हल्ल्याचा निषेध केला. “आमचे निर्दोष नागरिक आणि आमच्या देशांतर्गत क्रिकेटपटुंचा या अत्याचाऱ्यांनी केलेला नरसंहार हा गंभीर अपराध आहे. खेळाडू आणि नागरिकांची हत्या हा सम्मान नाही, तर घोर अपमान आहे, अफगाणिस्तान अमर राहो!” असं फजलहक फारूकीने म्हटलं आहे.
राशिद खानने काय लिहिलं?
“अफगाणिस्तानवरील पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात आमच्या नागरिकांची प्राण गमावले, त्याचं मला दु:ख आहे. या हल्ल्याने महिला, मुलं आणि जागतिक स्तरावर आपल्या देशाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या युवा क्रिकेटपटुंचे प्राण घेतले. पाकिस्तान विरुद्ध आगामी सामने रद्द करण्याच्या अफगाण क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. या कठीण प्रसंगात मी आपल्या लोकांसोबत उभा आहे. आमचा राष्ट्रीय स्वाभिमान, प्रतिमा सर्वात आधी येते” असं राशिद खानने लिहिलं आहे.