पाकिस्तानकडून काही महिन्यांआधी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 20 पेक्षा भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. भारताने या हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरद्वारे घेतला. विनाकारण कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला भारताने जन्माची अद्दल घडवली. भारताने केलेल्या या कारवाईमुळे पाकस्तानची चांगलीच मस्ती जिरली होती. मात्र या पाकिस्तानने पुन्हा कुरापती केल्या. पाकिस्ताने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानमधील 3 युवा क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला. त्यानंतर संतापाची लाट पसरली आहे.
अफगाणिस्तानने यानंतर आता पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या टी 20i मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने केलेल्या या एअर स्ट्राईकचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे. अफगाणिस्तानच्या या 3 खेळाडूंच्या मृत्यूमुळे क्रिकेट वर्तुळात आणि एकूणच देशावर शोककळा पसरली आहे. आता या प्रकरणात बीसीसीआय आणि आयसीसीनेही प्रतिक्रिया दिली आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आपण अफगाणिस्तानसह असल्याचं स्पष्ट केलंय.
अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. कुरापत्या करणाऱ्या पाकिस्तानला काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानने चांगली अद्दल घडवली होती. मात्र त्यानंतरही पाकिस्तानने क्रूरपणा केला. पाकिस्तानने शुक्रवारी 17 ऑक्टोबरला अफगाणिस्तानमधील रहिवाशी भागावर हवा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात क्लब क्रिकेट खेळणाऱ्या तिघांचा मृ्त्यू झाला. करीब आगा, हारून आणि सिबगतुल्लाह असं मृत खेळाडूंचं नाव आहे. तर काही खेळाडू हे जखमी आहेत.
आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी पाकिस्तानचं थेट नाव न घेता संताप व्यक्त केलाय. तसेच पाकिस्तानच्या या हल्ल्याला मुर्खपणा असल्याचं म्हटलंय. “कबीर आगा, सिबगतुल्लाह आणि हारुन खान या 3 अफगाणी क्रिकेटपटूंच्या मृत्यूमुळे मी फार दु:खी आहे. या खेळाडूंचं स्वप्न हे मुर्खांच्या हिंसेमुळे पूर्ण होऊ शकलं नाही. या अशा युवा प्रतिभावान खेळाडूंची हत्या हे केवळ अफगाणिस्तान बोर्ड नाही तर साऱ्या क्रिकेट विश्वासाठी शोकांतिका आहे. आम्ही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या पाठीशी आहोत”, अशा शब्दात जय शाह यांनी आपल्या भावना व्यक्त करत अफगाणिस्तानसोबत असल्याचं म्हटलंय.
बीसीसीआयही अफगाणिस्तानच्या पाठीशी
बीसीसीआयनेही या घटनेचं तीव्र शब्दाच निषेध व्यक्त केला. तसेच खेळाडूंच्या मृत्यूबाबत दु:ख आणि संवेदना व्यक्त केल्या. निष्पाप आणि विशेष करुन प्रतिभावान खेळाडूंचं मृत्यू होणं फार दु:खद आणि चिंताजनक असल्याचंही बीसीसीआयने म्हटलंय.
दरम्यान या भ्याड हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तान विरुद्ध न खेळण्यास नकार दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20i मालिका प्रस्तावित आहे. अफगाणिस्तानच्या या निर्णयानंतर आता सर्वांचं लक्ष हे आयसीसीकडून लागून आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतातही संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट टीमवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. आधीच भारतीयांमध्ये पाकिस्तानबाबत संताप आहे. त्यात आता पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील निष्पापांचा जीव घेतलाय. त्यामुळे आता तरी आयसीसी पाकिस्तान क्रिकेट टीमबाबत ठोस पाऊलं उचलत मोठा निर्णय घेणार का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.