ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे, विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी या योजनेची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला. राज्यात महायुतीचे सरकार स्पष्ट बहुमतानं सत्तेत आलं.
दरम्यान जर आमची सत्ता आली तर आम्ही या योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ असं अश्वासन देखील त्यावेळी महायुतीमधील काही नेत्यांकडून देण्यात आले हेते. मात्र आता राज्यात सरकार येऊन एक वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे, तरी देखील सन्मान निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे सन्मान निधीत कधी वाढ होणार? याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे, साताऱ्यामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हणाले शिंदे?
आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय, अडीच वर्षात माझं काम तुम्ही पाहिलं आहे. मी अडीच वर्षात अडीच तास शांत झोपलो नसेल, लाडक्या बहिणींनी ठरवलं होतं लाडक्या भावाला निवडून आणायचं. योजनेसाठी वर्षाला 45 हजार कोटी रुपयांचा खर्च होता, भल्याभल्यांची हिंमत झाली नाही. ज्यांनी या योजनेत खोडा घातला, त्यांना लाडक्या बहिणींनी 232 नंबरचा जोडा दाखवला. महारष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या. पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देतो त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. दरम्यान 1500 रुपयांचे 2100 रुपये योग्य वेळी करणार हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आहे, तो आम्ही पाळणार आहोत, मी जे बोलतो ते करून दाखवतो अशी घोषणाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली आहे.