भारताने न्यूझीलंडविरुद्धचा चौथा सामना 50 धावांनी गमावला. खरं तर पहिल्या तीन सामन्यातील कामगिरी पाहता हा पराभव फार मोठा आहे. पण पराभवाचं अंतर आणखी जास्त असतं. जर शिवम दुबेने झंझावाती अर्धशतक ठोकलं नसतं तर चित्र फारच वाईट असतं. शिवम दुबेने या सामन्यात अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानंतर त्याला ‘दानव’ ही उपाधी दिली गेली आहे. राजस्थान रॉयल्सने दुबेची फलंदाजी पाहून सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी मिश्किलपणे लिहिलं की, ‘नवा सामना, नवा दानव!’ शिवम दुबेचा हा आक्रमक अंदाज काही असाच आला नाही. यामागे त्याचं कठोर परिश्रम आहे. गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवने टाकलेला विश्वास आहे. स्वत: शिवम दुबेने याबाबतचा खुलासा केला. शिवम दुबेने चौथा टी20 सामना संपल्यानंतर सांगितलं की, सलग सामने खेळल्याने आणि गोलंदाजीमुळे मनोबळ वाढलं आहे.
शिवम दुबेने सांगितलं की, ‘ही माझ्या कठोर परिश्रमाचं फळ आहे. सलग सामने खेळणे आणि अशा परिस्थिती फलंदाजी केल्याने माझं मनोबळ वाढलं आहे. मला कळून जातं की काय होणार आहे. गोलंदाज माझ्या समोर आणि माझ्या विरुद्ध काय करू शकतो ते.’ शिवम दुबेने पुढे सांगितलं की, जेव्हापासून गोलंदाजी करत आहे, तेव्हापासून फलंदाजीत सुधारणा झाली आहे. दुबेने पुढे सांगितलं की, ‘गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांच्यामुळे गोलंदाजी करत आहे. त्यांनी मला गोलंदाजी करण्याची संधी दिली. जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता तेव्हा तुमची समज वाढते. मी त्यावर काम करत आहे आणि स्वत:ला आणखी सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे.’
शिवम दुबेने चौथ्या टी20 सामन्यात 23 चेंडूत 65 धावा काढल्या, यात त्याने 7 षटकार मारले. या खेळीबाबत सांगताना शिवम दुबे म्हणाला की, ‘मी खरंच या मागे मेहनत घेतली आहे. पण मला गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची संधी मिळाली. अनुभव नावाची गोष्ट असते आणि तो अनुभव मला मिळाला आहे. योग्य दिशेने पुढे जात आहे. लोकं अनेक गोष्टीत सुधारणा करत असतात.’ शिवम दुबे म्हणाला की, तुम्ही आहात तसेच राहू शकत नाही. कारण विरोधक अधिक सक्षम होत असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या खेळात सुधारणा करणं आवश्यक आहे.