पिंपरी, ता. २६ ः ‘‘बदलत्या काळानुसार प्रत्येकाने तंत्रस्नेही होणे अत्यावश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे नोकऱ्यांसाठी धोका नसून त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि गती वाढवणारे प्रभावी साधन आहे,’’ असे प्रतिपादन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या माध्यम व जनसंज्ञापन विभागाचे उपसंचालक प्रा. सुशोभन पाटणकर यांनी केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात महापालिकेतर्फे ‘पत्रकारिता क्षेत्रात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा उपयोग’ विषयावर आयोजित व्याख्यानात पाटणकर बोलत होते. उपमहापौर शर्मिला बाबर उपस्थित होते. एआय म्हणजे काय, ते कसे कार्य करते, एआयचे विविध प्रकार, लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम) यांची संकल्पना, प्रभावी प्रॉम्प्ट लिहिण्याची पद्धत याविषयी त्यांनी उदाहरणांसह सविस्तर माहिती दिली. मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.
---