सन 2024 सालाच्या तुलनेत 2025 साली राज्यात बेपत्ता महिला व अल्पवयीन मुलींची संख्या अधिक; राज्य सरकारच्याच आकडेवारीतून धक्कादायक वास्तव
सूरज सावंत March 04, 2026 04:43 PM

Maharashtra Missing Women and Minor Girls: महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये वाढल्याची धक्कादायक माहिती राज्य सरकारनेच विधिमंडळात सादर केली आहे. या गंभीर विषयावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास आणि शोधमोहीम अधिक तीव्र करण्याचे आश्वासन दिले आहे.

आकडेवारी काय सांगते? (2024 विरुद्ध 2025)

  • राज्य सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या एका वर्षात बेपत्ता महिला आणि मुलींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे
  • बेपत्ता महिला: 2024 साली हा आकडा 45,662 इतका होता, जो 2025 मध्ये वाढून 48,278 वर पोहोचला आहे.
  • अल्पवयीन मुली: 2024 मध्ये 11,316 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या, तर 2005 मध्ये ही संख्या 12,113 झाली आहे.
  • या पार्श्वभूमीवर, हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी राबवण्यात आलेल्या 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत आतापर्यंत एकूण 41,193 मुला-मुलींना शोधण्यात यश आल्याची माहिती 

विरोधकांचा हल्लाबोल 

काँग्रेस नेते भाई जगताप यांनी या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेत सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर मुली गायब होत आहेत. साधारण 12 हजार महिला बेपत्ता असून त्यात 2 हजार अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. राज्याच्या यंत्रणा राबवूनही जर इतक्या मोठ्या प्रमाणात लेकी-बाळी बेपत्ता होत असतील, तर ही बाब राज्यासाठी भूषणावह नाही. हा मुलींच्या सुरक्षेचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे."

95-96 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे आमचे लक्ष्य

या गंभीर विषयावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, अनुभवानुसार, पहिल्या वर्षभरात साधारण 55 ते 60 टक्के महिलांचा शोध लागतो. अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत आपण 90 टक्क्यांपर्यंत पोहोचतो. आमचे उद्दिष्ट 95-96 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचे आहे आणि तोपर्यंत आम्ही काम थांबवणार नाही.  अनेकदा वर्षभरानंतर मुलींचे कुटुंबीय किंवा वयस्कर व्यक्तींच्या बाबतीत नातेवाईक पाठपुरावा करणे सोडून देतात, ही एक मोठी अडचण असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दर महिन्याला या विषयावर बैठक घेतली जाते. ज्या पोलीस स्थानकांनी किंवा अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे, त्यांची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. बेपत्ता महिलांना शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, कोणत्या पोलीस स्थानकाने किती शोध लावला आणि त्यात आणखी काय सुधारणा करता येतील, यावर शासन भर देत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.