कासा (बातमीदार) ः रोशनी फाउंडेशनतर्फे डहाणू आणि तलासरी येथील वंचित आदिवासी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘सप्तरंगी स्वप्ने’ ही बालचित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ४० शाळांमधील ५८० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होत. आदिवासी विद्यार्थ्यांमधील कलाकौशल्य, सर्जनशीलता, कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी रोशनी फाउंडेशन १० वर्षांपासून हा उपक्रम करत आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य देण्यात आले. स्पर्धा पाच गटांमध्ये घेण्यात आली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ ट्रॉफी, ४० बक्षिसे आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सर्वोत्कृष्ट वारली कलाकाराला नवीन सायकल देऊन गौरवण्यात आले.