Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा (Ketan Agrawal Case) पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 18 जून रोजी घडली होती. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच, आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झाला आहे. ज्या घरात लग्नाचे सनई चौघडे वाजणार होते, त्या घरात आज स्मशान शांतता पसरली आहे. ज्या घरात मंडळी वऱ्हाडी म्हणून येणार होती, तीच मंडळी आता सांत्वन करण्यासाठी येताहेत. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवालची हत्या करण्यात आलीय. सिया गोयलशी (Siya Goyal) लग्न करून सुखी संसाराचं स्वप्न केतननं पाहिलं होतं. पण तिनंच केतनचा (Ketan Agarwal Murder Case) केसानं गळा कापलाय आणि या हत्येत सियाला साथ दिली ती, तिचा प्रियकर चेतन चौधरीनं (Chetan Chaudhary). दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. यात एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा संपूर्ण कट असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
Ketan Agarwal Case Siya Goyal: "जेव्हा आपण किल्ल्यावर असू तेव्हा मी खाली वाकेन, तेव्हा तू....
मिळालेल्या माहितीनुसार, एकीकडे केतन अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी अनेक खळबळजनक आरोप केले असताना पोलीस कोठडीत असलेली मुख्य आरोपी सिया गोयलचं वर्तन खूपच हट्टी स्वरूपाचं दिसत आहे. यावेळी ती चौकशीला सहकार्य करत नसून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ती थेट मौन बाळगत असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पोलीस जेव्हा तिला प्रश्न विचारतात, तेव्हा ती काही प्रश्नांची उत्तरं देत नाहीये, मात्र तिने या भयानक कटाचा मुख्य सूत्रधार स्वतःच असल्याचं कबूल केलं आहे. चौकशीत सियाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, केतनला संपवण्यासाठी तिने आणि चेतनने एक सांकेतिक भाषा ठरवली होती. तिने चेतनला सांगितलं होतं की, "जेव्हा आपण किल्ल्यावर असू तेव्हा मी खाली वाकेन, तेव्हा तू समजून जायचं की केतनला धक्का देण्याची हीच ती वेळ आहे." दरम्यान, ठरल्याप्रमाणे, हत्येच्या दिवशी म्हणजेच 18 जून रोजी जेव्हा हे तिघेही लोहगड किल्ल्यावर पोहोचले. तेव्हा चेतन या दोघांच्या अगदी जवळ आला, तेव्हा सिया अचानक खाली वाकली. हाच इशारा समजून चेतननं ठरलेल्या कटानुसार केतनला धक्का दिल्याचं सांगितलं जात आहे.
सिया बारावी फेल, पण चेतनच्या साथीने रचला चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा थरारक कट (Ketan Agarwal Murder Case)
दरम्यान, पोलीस तपासात सियाच 1वी पर्यंत शिक्षण पूर्ण झालं असून ती 12 वी नापास असल्याचे समजलं आहे. सोबतच तिला दारूसह इतर वाईट सवयींमुळे तिचे आई-वडील प्रचंड त्रस्त होते. सियाचे यापूर्वीही अनेक बॉयफ्रेंड राहिले होते. आपली मुलगी हाताबाहेर गेली आहे, हे समजल्यामुळे तिचे लग्न लावून तिचे आयुष्य स्थिर करण्याचा तिच्या पालकांचा प्रयत्न होता. त्यासाठी पालकांनी तिच्यासाठी केतनची निवड केली होती. केतन हा चांगल्या घरातील आणि सुशिक्षित मुलगा होता. शिवाय घरची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती. त्यामुळे सियाने केतनसोबत लग्न करावं, यासाठी तिच्या पालकांचा दबाव होता. केतनला रिजेक्ट करता यावं, अशी एकही गोष्ट सियाकडे नव्हती. त्यामुळेच सियाने केतनला मारण्याचा कट रचला.