ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतील सर्व शाळांना ६ जुलै रोजी सुट्टी जाहीर.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला.
सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना सुट्टीचा आदेश लागू.
अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून प्रशासनाने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे, कल्याण- डोंबिवलीच्या महानगरपालिका प्रशासनाने सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस होतोय. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ६ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. प्रादेशिक हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना आदेश जारी केले आहेत.
प्रशासनाने सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सुट्टीची माहिती तात्काळ पालकांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सकाळच्या सत्रातील विद्यार्थी शाळेत पोहोचल्यास त्यांना सुरक्षितपणे घरी पाठविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देशही केडीएमसी शिक्षण विभागाकडून शिक्षण अधिकारी भारत बोरनारे यांनी दिले आहेत.
रेड अलर्टमुळे उल्हासनगरातील सर्व शाळा- महाविद्यालयांना सुट्टीउल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अतिमुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, पाणी साचणे व पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन शनिवार, ६ जुलै रोजी महानगरपालिका हद्दीतील सर्व राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई तसेच इतर सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील परिस्थितीनुसार आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना शाळा व महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.