गेल्या काही दोन महिन्यांपासून राज्यात पावसाने ओढ दिली आहे. मधले आठ एक दिवस काय तेवढा पाऊस झाला. त्यानंतर पाऊस पुन्हा एकदा गायब झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. अल निनोमुळे पावसाचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे यंदा पाऊस कमी होणार असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे. हवामान विभागाच्या या विधानाने राज्यातील जनतेचं टेन्शन वाढलं आहे. मात्र, आता नवीन अपडेट समोर आली आहे. आता टेन्शन घेण्याची गरज नाही. सांगलीच्या आमणापूर येथील भावई उत्सवात यंदा समाधानकारक पावसाचे भाकीत करण्यात आलं आहे. बळीराजासह राज्यातील नागरिकांसाठी हा दिलासा मानला जात आहे. पण खरोखरच समाधानकारक पाऊस होईल की नाही हे पाहावे लागणार आहे.
सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर येथील अनेक पिढ्यांची परंपरा असणारा भावई उत्सव सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी पारंपारिक वेशात जोगणा-जोगणीची दौड पार पडली. यावेळी महादेव मंदिरातून दिवा काढण्याची परंपरा आहे. या दिव्यात गोम किडा निघाल्यावर यंदा पाऊस समाधानकारक असल्याचे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ना अतिवृष्टी, ना दुष्काळ
गावातील सामाजिक ऐक्य जपण्याचे काम बारा बलुतेदारांच्या या लोक उत्सवातून होत आहे. गावगाड्यातील कुंभार, नाभिक, माळी, तराळ, रामोशी, दलित, सुतार, धनगर, जंगम, ब्राम्हण, मराठा, परीट, गुरव आणि कोळी हे समाज एकत्रित येऊन हा लोकोत्सव साजरा करित आहेत. यामध्ये पोलिस पाटील, राडे-फडणे, उगळे, कुलकर्णी, सुतार -पाटील यांना पंचाचा मान आहे. सकाळी महादेव मंदिरातून दिवा काढण्याची परंपरा पार पाडण्यात आली.
दिव्यात गोम किडा निघाल्यावर यंदा पाऊस समाधानकारक असल्याचे भाकीत व्यक्त करण्यात आले. दिव्यामध्ये यंदा ‘गोम’ किडा निघाल्याने समाधानकारक पाऊस, म्हणजे ना अतिवृष्टी ना दुष्काळ; शेतीला पोषक असा हंगाम होण्याची शक्यता असल्याचे पारंपरिक मानले जाते.
जोगणीने मारली बाजी
सायंकाळी पारंपारिक वेशात जोगणा-जोगणीची दौड बलुतेदारांच्या सशस्त्र संरक्षणात संपन्न झाली. यामध्ये जोगणीने बाजी मारली. यंदाच्या कार्यक्रमातील तरूणाईचा सहभाग मोठा दिसला. हा उत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भावीक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.