Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. यावेळीराष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील वर्षा निवासस्थानी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच या भेटीसंदर्भात खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत जयंत पाटील यांनी माहिती दिली आहे.
इस्लामपूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष अपात्र ठरवल्या प्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. माझा आणि प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्या भेटीचा संबंध नाही. रात्री साडे दहा वाजता वर्षा निवासस्थानी पोहोचलो आणि पावणे अकरा वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर पडल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांची 5 मिनिट चर्चा करून बाहेर पडल्याचे पाटील म्हणाले. तटकरे पटेल त्याठिकाणी असल्याची कोणतीही मला माहिती नव्हती अशी माहिती जयंत पाटील यांनी एबीपी माझाला दिली.
तीन बडे नेते एकत्र येऊन जर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटत असतील तर हा योगायोग असूच शकत नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. ही महाराष्ट्रातील राजकारण परिवर्तनाची नांदी असल्याचे मिटकरी म्हणाले. कालच जयंत पाटील यांनी आमदार आणि खासदारांसोबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. काही आमदार आणि खासदार एनडीएमध्ये सामील होण्यास तयार असल्याची माहिती मिटकरींनी दिली,
जयंत पाटील हे त्यांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात किंवा अन्य काही कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असतील, तर त्यात विशेष काही नाही. त्यात राजकारण आहे असं म्हणता येणार नाही असे मत शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी एबीपी माझाला सांगितले. सुनील तटकरे आणि जयंत पाटील ठरवून गेले असतील असं मला वाटत नाही. कारण मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी कोणीही जाऊ शकते असे काकडे म्हणाले.