Indian Railway: रेल्वेत चोरी झाली चादर, टॉवेल; कोणाकडून वसूल होते नुकसान भरपाई?
Tv9 Marathi July 15, 2026 02:45 AM

Indian Railway Compensation Rules: आरामदायी प्रवासासाठी भारतीय रेल्वे एसी डब्यात बेडशीट, टॉवेल, उशी आणि ब्लँकेटची सुविधा पुरवते. काही प्रवाशी या वस्तू चोरतात. काही जण पकडलेही जातात. त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई होते. अनेकदा प्रवासी निसटतात. माहितीच्या अधिकारातंर्गत (RTI) मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षी हजारो चादरी आणि टॉवेल मोजणीत कमी आढळतात. रेल्वेला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसतो. मग या वस्तूची वसूली कशी होते? त्याची नुकसान भरपाई मिळते कशी?

या चोरीची जबाबदारी कोणाची?

प्रवाशी, भुरटे चोर अथवा काही प्रकरणात कर्मचारी हे साहित्य चोरतात. या चोरीची भरपाई कोण करते? रेल्वेच्या नियमानुसार, डब्यातील बेडरोलची जबाबदारी ही कोच अटेंडंट अथवा बेडरोल पुरवठा करणाऱ्या आऊटसोर्सिंग कंपनीची असते. रेल्वे सुटल्यानंतर ती तिच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचेपर्यंत सर्व बेडरोल, लिननची सुरक्षा ही संबंधित अटेंडंटकडे असते. त्याचे काम सुरू झाल्यावर तो डेपोकडून ठराविक संख्येत हे साहित्य घेतो. त्याची रीतसर नोंद होते. प्रवास संपल्यानंतर ट्रेन यार्डमध्ये उभी राहते. लिनन विभाग एसी डब्यातील साहित्याची, वस्तूंची संख्या पुन्हा मोजते. या तपासणीत चादर, उशी अथवा टॉवेल कमी आढळल्यास, या वस्तूंची किंमत संबंधित अटेंडेंटच्या पगारातून वसूल होते. त्याचा पगार कापल्या जातो.

कंत्राटदाराच्या बिलातून रक्कम होते वजा

अनेक मार्गावर बेडरोल पुरवठ्याचे काम खासगी कंत्राटदारांकडे असते. रेल्वे डब्यातून बेडशीट, टॉवेल, उशी आणि ब्लँकेटची चोरी झाल्यास, साहित्य कमी आढळल्यास त्याची भरपाई संबंधित कंत्राटदाराकडून करण्यात येते. त्याच्या मासिक बिलातून ही रक्कम कपात होते. या भरपाईला अनेक कंत्राटदार आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. रेल्वेतून बाहेर पडत असलेल्या प्रवाशांच्या बॅग तपासणे अथवा त्यांचे सामान त्यांना दाखवायला लावणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. साहित्य प्रवाशीच नेतात हे जर माहिती आहे, तर त्याची जबाबदारी कंत्राटदार अथवा कर्मचार्‍यांकडून भरपाई करणे योग्य नसल्याचा दावा करण्यात येतो.

हे नुकसान कमी करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दल आता ट्रेन्समध्ये नियमीतपणे अचानक तपासणी करतात. तर रेल्वे थांबल्यावर संबंधित एसी डब्याची तपासणी होते. काही घटनेत प्रवाशी पकडले जातात. त्यांच्याविरोधात रेल्वे मालमत्ता (बेकायदेशीर ताबा) अधिनियम, 1966 अंतर्गत कठोर कारवाई होते. चादर, ब्लँकेट, उशी अथवा इतर मालमत्ता चोरताना प्रथम पकडल्यास संबंधित व्यक्तीला कमाल 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास होतो.प्रवाशाला 1 हजारांचा दंड होऊ शकतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.