सचिन अहिर यांनी नेत्यांना दिली शपथ, वरळीत मोठा गेम होणार? थेट आदित्य ठाकरे यांना टेन्शन
Tv9 Marathi July 15, 2026 02:45 AM

काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला होता. सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सचिन अहिर यांनी विधान परिषदेचे उपसभापति बनवण्यात आले आहे. आज सचिन अहिर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा वरळीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा हे उपस्थित होते. यावेळी बोलताना सचिन अहिर यांनी उपस्थित नेत्यांना महत्त्वाची शपथ दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मी समाजासाठी निर्णय घेतला

यावेळी बोलताना सचिन अहिर यांनी म्हटले की, ‘सर्वात आधी मी आपली क्षमा मागतो, राजकारणात काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागतात. एक भूमिका 2019 साली घेण्याचे काम केलं तेव्हा टीका झाली. वरळीकरांसाठी, समाजातील एक घटक म्हणून साथ द्यायची की विरोध करायचा याचा विचार मी केला. काही लोक म्हणतात की हा स्वार्थ आहे. हो मी आम्ही छाती ठोकून सांगतो हो माझा स्वार्थ आहे, पण माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांसाठी समाजासाठी मी तो निर्णय घेतला.’

पुढे बोलताना अहिर यांनी म्हटले की, ‘काही लोक सांगतात अनेकांना भरपूर दिलं अजून काय पाहिजे ? जी जी जबाबदारी मला दिली ती पार पाडण्याचं काम मी केलं. मला ज्या दोन विधानसभा संपर्कप्रमुख म्हणून दिल्या त्यात एक बाबाजी काळे यांना सर्वाधिक मतदान पडले. त्यांना मी निवडून आणण्याचे काम केले. या भागात सुनील अहिर पहिलाच नगरसेवक होता, येथील पाच नगरसेवक निवडून आणण्यासाठी मी तर मन धन देऊन काम केलं. मी कालही सेक्युलर होतो आजही सेक्युलर आहे आणि उद्याही सेक्युलर राहील.’

आदित्य ठाकरेंना टोला

पुढे बोलताना सचिन अहिर यांनी म्हटले की, ‘मिलिंद जी तुम्ही आणि मी मिळून आज शपथ घेऊया, या वरळीकरांसाठी दक्षिण मुंबईतील नागरिकांसाठी पूर्ण ताकतीने विकासासाठी काम करू गतीने काम करू. 2024 विधानसभा आणि महानगरपालिकेवेळी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी मला पक्षात येण्याचा आग्रह केला होता. मिलिंद जी वरळीची जागा आम्ही तुम्हाला देणार नाही, तुम्ही दिल्ली पहा मी गल्ली पाहतो. इथे लोकांना गृहीत धरले आहे, काही लोकांनी सातबाराच नावावर केला आहे’ असं म्हणत आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांचे कौतुक

सचिन अहिर यांनी पुढे बोलताना सांगितले की, आम्ही आकर्षित का झालो? गिरणी कामगारांचा मोर्चा होता, कोणीही विचारत नव्हते. मी निश्चय केला हा शेवटचा मोर्चा असेल. उदय सामंतांनी मध्यस्थी केली. मी त्यांना सांगितलं राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांना भेटायला येऊद्या. साडेबारा वाजता एकनाथ शिंदे नंदनवनला आले, ते आमच्या शिष्टमंडळाला भेटले. गिरणी कामगारांना मुंबईच घर देण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली.

पुढे बोलताना अहिर यांनी सांगितले की, ‘बेस्टचा संप होता. काही लोक याला मेसा लावत होते, कुणी मध्यस्थी करायला तयार नव्हते, मी प्रताप सरनाईकांना मध्यस्थी करायला भाग पाडले. त्यांनी आश्वासित केले संप मागे घ्या, आम्ही नाही म्हणून सांगितलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या समस्या सोडवाव्यात असं म्हटलं, तिसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेंनी आम्हाला वेळ दिली. समिती गठीत केली आणि कामगारांना 3000 रुपयांची वाढ केली, दोन हजार रुपये कंत्राट कामगारांना दिले. मी जरी वेगळी भूमिका घेतली असली तरी मात्र उद्धव ठाकरे साहेबांनी शुभेच्छा देखील दिल्या नाहीत. मी एकच सांगतो की पद बदलले आहे, पण मी व्यक्ती म्हणून तीच व्यक्ती हे सर्वां लक्षात ठेवावे.’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.