यवतमाळ : राज्यातील अनेक गावात मृत्यूनंतर नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागतात. त्यात, पावसाळ्यात सर्वाधिक त्रास नागरिकांना किंवा पीडित कुटुंबीयांना होतो. पावसामुळे आधीच चिखल, घाणीचे साम्राज्य असते, किंवा मृतदेहावर अंत्यसंस्कार (Funeral) करतेवेळी छत नसल्याने पडत्या पावसात अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येतात हे पाहायला मिळते. गतवर्षी तर चक्क नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्यात आल्याची धक्कादायक घटना सोर आली होती. मात्र, अद्यापही अशा मरणयातना ग्रामस्थांना भोगाव्या लागतात. आता, यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील मदनापूरमधील ग्रामस्थांनी चक्क ग्रामपंचायत परिसरातच मृतदेहावर अंत्यसंस्कार गेल्याची घटना उघडकीस आली आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील मदनापूर येथील ग्रामस्थांच्या अव्यवस्थेची दुर्दर्शा चव्हाट्यावर आली आहे. येथील गावात स्मशानभूमीच नसल्याने एका 81 वर्षीय वृद्धावर चक्क ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांचा तीव्र संताप व्यक्त होत आहे. मदनापूर येथील रामदास पुरुषोत्तम मानकर (81) यांचे निधन झाले. मात्र, गावासह परिसरातील गावांमध्ये स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने अंत्यसंस्कार कुठे करायचे, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांसमोर निर्माण झाला.
यावेळी मृतकाचा मुलगा विजय मानकर यांनी प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या वडिलांवर गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणातच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला आणि अखेर रामदास मानकर यांच्यावर ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांनी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी अनेकवेळा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे केली होती. मात्र, प्रशासनाच्या उदासीन आणि अडेलतट्टू भूमिकेमुळे आज अशी वेळ गावकऱ्यांवर आली आहे.
सरकारने एकीकडे गाव तिथं स्मशानभूमी हे धोरण अवलंबवले आहे. त्यातून, राज्यातील सर्वच गावांत स्मशानभूमी उभारण्यात येईल, मात्र अद्यापही कित्येक गावांत स्मशानभूमीच नाही. त्यामुळे, येथील ग्रामस्थांच्या मरणयातना काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येते.
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा