बारामती - राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर व लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीच्या राजकीय पटलावर देखील मोठे बदल घडले. पवार कुटुंबीयांमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांचा संपर्क अधिक वाढल्याची बाब खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच बोलून दाखविली.
मंगळवारी (ता. 8) बारामतीत आयोजित वकिलांच्या संवाद मेळाव्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीमध्ये याचा उल्लेख केला. बारामतीचे वकील ऍड. अरविंद गायकवाड यांनी अजित पवारांनी आपली उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी केली, त्याला उत्तर देताना तुमच्या मनात जो उमेदवार आहे तोच उमेदवार तुम्हाला विधानसभेला पाहायला मिळत असे सांगितले.
त्याला जोडून अजित पवार म्हणाले की, अलीकडच्या काळात एक झालं बारामतीत कधी नव्हे ते पवार कुटुंबीयांचा संपर्क वाढला आहे, ते लोकांच्या भेटीसाठी घेऊ लागले आहेत, घरोघरी जायला लागलेले आहेत, संपर्क वाढवायला लागलेले आहेत. साड्या वाटायला लागले आहेत, घमेली वाटायला लागले आहेत, टिफिनचे डबे व सायकली देखील वाटायला लागलेले आहेत. अर्थात आहे म्हणून वाटतो आम्ही. त्यामुळे तुम्ही घ्यायला देखील संकोच करू नका. 1967 पासूनचा विचार केला तर हे काहीच नाही अजून खूप काही आम्ही वाटायला हवे असे हसत हसत त्यांनी सांगितले.
तेवढ्यात गर्दीतून एकाने एकच वादा अजित दादाची घोषणा दिली. त्यावर तू वकील आहेस का रे, असे त्याला अजित पवार यांनी विचारले. ही वकिलांची मिटींग आहे, अशी आठवण करून दिली, पण पुढच्या क्षणी हे वेगळ्या अर्थाने घेऊ नको, नाहीतर माझं एक मत कमी होईल. अस हसत त्यांनी सांगितल्यावर हास्यकल्लोळ झाला.