मुंबई : सध्या शहरांमध्ये घर खरेदी करायचं असल्यास प्रत्येकाकडे लाखो रुपयांची रक्कम असणं आवश्यक असतं. मात्र, अनेकांकडे एकाच वेळी घराची किंमत पूर्णपणे देऊन खरेदी करण्याइतकी रक्कम नसते. त्यामुळं त्यांना गृहकर्ज काढून घर खरेदी करावं लागतं. सध्या भारतात घर खरेदीसाठी 8.10 ते 12 टक्के व्याजानं गृहकर्ज मिळतं.गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर आणि संबंधित संस्थेची आर्थिक स्थिती यावर कर्ज किती व्याज दरानं मिळणार हे ठरतं. मात्र, एखाद्या व्यक्तीला गृहकर्ज घ्यायचं असल्यास त्यानं कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे त्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये पगाराची रक्कम, कर्जाची मर्यादा, आपत्कालीन निधी, यासह विविध गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे.
गृहकर्ज घेताना आपल्याकडे किमान 5 ते 6 महिन्यांच्या पगाराइतकी रक्कम आपत्कालीन निधी म्हणून शिल्लक असला पाहिजे. गृहकर्जाचा कालावधी किमान 20 वर्षांचा असतो, दरम्यानच्या काळात काही अडचणी येण्याची शक्यता असते. त्यामुळं आपत्कालीन निधी असावा. त्यामुळं घर खरेदी करताना ज्या किमतीचं घर खरेदी करतोय त्याच्या किमान 20 टक्के रक्कम संबंधित व्यक्तीकडे शिल्लक असावी. म्हणजे 20 टक्के रकमेचं डाऊन पेमेंट केल्यास व्यक्तीवर अधिक ताण येणार नाही. याशिवाय गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीनं त्याच्या पगाराच्या 40 ते 50 टक्क्यापेक्षा अधिक ईएमआय होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे. गृहकर्ज घेताना त्याची परतफेड करताना ईएमआय भरताना जीवनातील गोष्टींसाठी तडजोड करावी लागू नये.
समजा एखाद्या व्यक्तीनं 50 लाखांचं गृहकर्ज 20 वर्षांच्या मुदतीसाठी 9 टक्के व्याजदरानं घेतलं. तर, त्याला दरमहा किती हप्ता भरावा लागेल हे जाणून घेणं आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला 9 टक्के व्याजानं कर्ज घेतलं असल्यास 44986 रुपयांचा हप्ता दरमहा भरावा लागेल. 50 लाखांचं कर्ज 20 वर्षात नियमितपणे परतफेड करायचं ठरवल्यास 5796711 रुपयांचं व्याज भरावं लागेल. म्हणजेच मुद्दलापेक्षा अधिक रक्कम व्याज म्हणून द्यावं लागेल. एकूण परतफेड रक्कम 1 कोटी 7 लाख 96 हजार 711 रुपये इतकी होईल. समजा व्याज दर 8.5 टक्के असल्यास 43391 रुपयांचा हप्ता 20 वर्ष भरावा लागेल.
दरम्यान, गृहकर्ज घेताना तुम्ही व्याज दर कशा प्रकारे लागू करण्यात येणार आहे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. स्टॅटिक व्याज दर असल्यास पूर्ण कर्जाच्या काळात तो कायम राहतो. मात्र, फ्लोटिंग व्याज दर असल्यास तो नियमितपण बदल राहतो. यामध्ये व्याज दर कमी होत राहिल्यास त्याचा फायदा कर्जदाराला होईल. मात्र, आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास त्याप्रमाणं कर्जाचा व्याज दर वाढल्यास परतफेडीची रक्कम वाढू शकते.
इतर बातम्या :
अधिक पाहा..