योगेश काशिद, बीड: बीडच्या दगडवाडीत गावगुंडांकडून शेतकऱ्यांना धमकी मिळत असल्याचे समोर आले आहे. 138 एकर जमीन बळकवण्याचा राजकीय गुंडांचा डाव आहे. गावगुंडांकडून पाच लाख रुपये द्या आणि एक एकर जमीन द्या अशी खंडणीची मागणी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात दुसरा संतोष देशमुख होऊ नये याची सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे
आम्हाला रोज जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. पोलिसांमध्ये तक्रार देऊनही कुठली दखल नाही. राजकीय वरदहस्त वापरून 138 एकर जमीन बळकवायची आहे. पवनचक्की प्रकल्प उभारण्यासाठी गावगुंडांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जातो. जमीन सोडा नाहीतर तुम्हाला संपूवू अशा धमक्या येत आहेत, असं येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने पूर्ण होत आहेत. अशातच हे दगडगावामध्ये समोर आले आहे. बीडच्या शिरूर तालुक्यातील दगडवाडी येथील शेतकरी सिताराम नागरे, बाबासाहेब नागरे, रवींद्र नागरे, किसन कठाळे, राम नागरी, गणेश कठाळे, महादेव कठळे या शेतकऱ्यांची जमीन बळकवण्याचा गावगुंडांकडून प्रयत्न चालू आहे. या प्रकरणी तक्रार त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आणि पोलीस अधीक्षकांना दिली आहे.
पाटोदा बीड आणि छत्रपती संभाजी नगरच्या हायकोर्टात देखील शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय असताना ही जमीन राजकीय गावगुंडांना बळकवायची आहे. ही जमीन पवन ऊर्जा प्रकल्पाला देण्याचा हट्ट आहे. यामधून त्यांना लाखो रुपये मिळवायचे आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
मला रोज धमक्या दिल्या जातात. बीड जिल्ह्यामध्ये दररोज अशा घटना चालू आहेत. यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मस्साजोगमध्ये पवनचक्की प्रकल्प आणि आज पवनचक्की प्रकल्पातून मागण्यात आलेली खंडणी याच्यानंतर संतोष देशमुख यांची झालेली हत्या हे प्रकरण अजून थांबायचं नाव घेत नाही. तर दुसरीकडे बीडच्या शिरूर तालुक्यातील दगडवाडी येथील शेतकऱ्यांनी आम्हाला न्याय द्या अशी मागणी पत्र द्वारे केली आहे.